Tuesday, 21 February 2017

गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचने

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 II *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* II 🌷🙏🏻
----------------------------------------------
🌸!! ६ जानेवारी नाम - रूपाचा संबंध !!🌸

नाम घेत असताना रूपाचे ध्यान आवश्यक आहे का ? वास्तविक, नाम आणि रूप ही भिन्न नाहीतच. पण नाम हे रूपाच्या आधीही असते आणि नंतरही उरते. नाम रूपाला व्यापून असते. राम जन्माला येण्यापूर्वी वाल्मीकींनी रामायण लिहिले, आणि रामाने मागाहून जन्म घेऊन त्यात वर्णन केल्याप्रमाणे आचरण करून दाखविले. म्हणजे रूप अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होते, आणि रूप गेल्यानंतर आजही नाम शिल्लक आहे. देशकालाच्या पलीकडे जे कायम टिकते ते सत्य होय. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहते. म्हणजे नाम हे देशकालाच्या पलीकडे असते; म्हणजे ते रूपापेक्षा जास्त सत्य असते. जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे. तेव्हा नाम घेणे ही गोष्ट मुख्य आहे. ते घेत असताना रूपाचेही ध्यान राहिले तर उत्तमच; पण ते तसे न राहिले, तरी नाम घेत असताना रूपाचे स्मरण सूक्ष्मरूपाने असतेच असते. समजा, एका गृहस्थाच्या घरी राम नावाचा गडी आहे. तो गृहस्थ 'राम राम' असा जप करीत बसला आहे, पण त्याचे लक्ष राम-रूपाकडे नाही, मनात काहीतरी दुसरेच विचार चालू आहेत. अशा वेळी त्याला जर एकदम विचारले की, 'तुम्ही कुणाचे नाव घेत आहात' तर अर्थात् 'रामाचे' असेच उत्तर तो देईल. हे उत्तर देताना त्याच्या मनात "दाशरथी राम" हीच व्यक्ती असणार. "राम गडी" ही व्यक्ती नसणार. याचाच अर्थ असा की, नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्मरूपाने आत जागृत असते. म्हणूनच, रूप ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये. नामस्मरण करण्याचा अट्टाहास ठेवावा, त्यात सर्व काही येते.

एखाद्या माणसाची आणि आपली ओळख असेल तर पहिल्याने त्याचे रूप पुढे येते आणि नंतर नाम येते. पण आपली त्याची ओळख नसेल, आणि आपण त्याला बघितलेला नसेल, तर त्याचे फक्त नाव येते. आज आपल्याला भगवंताची ओळख नाही, म्हणून त्याचे रूप माहिती नाही; परंतु आपल्याला त्याचे नाम घेता येईल. सध्यासुद्धा, त्याचे नाम घेताना त्याची आठवण आपल्याला होते हा आपला अनुभव आहेच. भगवंताचे रूप तरी निश्चित कुठे आहे ? एक राम 'काळा' तर एक 'गोरा' असतो; एक राम 'लहान' तर एक 'मोठा' असतो; पण सर्व रूपे रामाचीच असतात. भगवंत स्वतः अरूप आहे; म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते. नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्यामध्येच ती लीन होतात. म्हणून भगवंताचे नाम श्रेष्ठ आहे. हे त्याचे नाम तुम्ही आवडीने, अखंड घ्या आणि आनंदात रहा.

६. दानात दान अन्नदान, उपासनेत उपासना सगुणाची उपासना, आणि साधनात साधन नामस्मरण.
🍀🍂🍀🍁🍀🍂🍀🍁🍀🍂

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 II *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* II 🌷🙏🏻
----------------------------------------------
🌸!! ७ जानेवारी नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे !!🌸

नामाचे प्रेम का येत नाही, हा प्रश्न बहुतेकजण विचारतात. पण थोडासा विचार केला तर असे लक्षात येईल की, हा प्रश्नच बरोबर नाही. मूल न झालेल्या बाईने, 'मुलाचे प्रेम कसे येईल ?' असे विचारण्यासारखाच हा प्रश्न आहे. मूल झाले की प्रेम त्याच्याबरोबरच येत असते. तेव्हा 'मुलाचे प्रेम कसे येईल' हा प्रश्न करण्याऐवजी 'मूल कसे होईल' याचाच विचार करणे बरोबर ठरेल. आपणसुद्धा प्रश्न करायचाच असेल तर 'नामाचे प्रेम कसे येईल' असा करण्याऐवजी, 'मुखी नाम कसे येईल' असा प्रश्न करणे बरोबर होईल. मुखी नाम यायला वास्तविक आडकाठी कोणाची आहे ? दुसर्‍या कोणाचीही नसून आपली स्वत:चीच आहे. वास्तविक, एकदा नाम घ्यायचे ठरवून सुरूवात केली की झाले. पण तसे होत नसेल तर, दोष दुसर्‍या कोणाचा नसून आपला स्वत:चाच आहे. म्हणून नाम घेणे हे आपले काम आहे; मग त्याच्या पाठोपाठ येणे हा प्रेमाचा धर्मच आहे. जसे आईच्या बाबतीत, मूल आणि प्रेमाचा पान्हा ही निराळी असूच शकत नाहीत, तसे नाम आणि त्याचे प्रेम ही एकमेकांना सोडून राहूच शकत नाहीत. ह्यावरून एक गोष्ट अशी ठरली की, 'प्रेम का येत नाही', याचे उत्तर आमच्याजवळच आहे, आणि ते म्हणजे, 'नाम घेत नाही म्हणून.' यावर कोणी असे म्हणेल की, आम्ही नाम घेतोच आहोत, तरीही प्रेम का येत नाही ? हे विचारणे ठीक. पण आता आम्ही जे नाम घेतो म्हणून म्हणतो, त्याचा विचार केला तर काय दिसेल ? पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो, तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो. सर्व संतांनी किंवा आपल्या गुरूने, नाम घ्यावे असे सांगितल्यामुळे आपण ते घेतो, किंवा दुसरे काही करायला नाही म्हणून घेतो, इतकेच. अर्थात्, तसे घेतले तरी आज ना उद्या आपले काम होईलच. पण 'प्रेम का येत नाही', असा प्रश्न विचारण्यापूर्वी, आपण नाम किती आस्थेने घेतो, हा प्रश्न स्वत:ला विचारणे जरूर आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झाले तर त्याच्याबाबतीत तिची जी स्थिती होते ती नामाच्या बाबतीत आपली होणे जरूर आहे.

आपल्या देहाची वाढ जशी आपल्याला नकळत होते, तशी आपली पारमार्थिक उन्नतीही आपल्याला नकळत झाली पाहिजे. ती कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव असतो. परमार्थात 'मिळविण्यापेक्षा' मिळविलेले 'टिकविणे', हेच जास्त कठीण आहे. ज्याला 'मी काही तरी झालो' असे वाटते तो काहीच झालेला नसतो. अशा माणसाने फारच सांभाळले पाहिजे.

७. नवर्‍याला देव आवडत नाही म्हणून बायकोने नामस्मरण सोडण्याचे कारण नाही. तिने नाम घेतले तर धर्म सोडला असे न होता उलट संसार सुखाचा होईल.
🍀🍂🍀🍁🍀🍂🍀🍁🍀🍂

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 II *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* II 🌷🙏🏻
----------------------------------------------
🌸!! ८ जानेवारी नामाचे प्रेम नामाच्या सहवासाने येईल !!🌸

नामाचे प्रेम आपल्या प्रेमळ आईकडेच बघा. मुलाला जरा ताप आला तरी आईच्या पोटात धस्स होते अन्न गोड लागत नाही अशा अनेक गोष्टी होतात. थोडक्यात म्हणजे तिला सर्व बाजूंनी अस्वस्थता उत्पन्न होते. नाम घेण्यात थोडा व्यत्यय आला तर आपली स्थिती तशी होते का याचे उत्तर आपल्याला स्वत:कडूनच मिळण्यासारखे आहे. नाम घेणे हा माझा धर्म आहे ते माझे आद्य कर्तव्य आहे त्याच्याशिवाय जगणे म्हणजे मेल्यासारखेच आहे नाम घेण्यात माझे आत्यंतिक हित आहे किंबहुना मी नामाकरिताच जन्माला आलो आणि तद्‌रूपच होऊन जाईन इतक्या प्रज्वलित भावनेने नाम घेणे जरूर आहे आणि मग प्रेम आले नाही ही गोष्ट शक्यच नाही. प्रेम येत नाही याचा अर्थच हा की आम्ही नाम खर्‍या आस्थेने घेत नाही. ह्या सर्वांवर उपाय म्हणजे घेण्याच्या निश्चयाने ते जसे येईल तसे घेत राहणे. तेच नाम आपल्याला एक एक पाऊल पुढे नेऊन ध्येय गाठून देईल. परिस्थिती चांगली आली म्हणजे नाम घेईन असे म्हणणारा मनुष्य नाम कधीच घेत नाही.

नाम हे मनात किंवा उच्चार करूनही घेता येते. नामात राहावे म्हणजे अंत:करणाची शुध्दता होईल आणि अंत:करण शुध्द झाले की भगवंताचे प्रेम येईल. नुसत्या पुष्कळ जपापेक्षा विवेकाने आणि विचाराने आलेले प्रेम नामात असणे जरूर आहे. खरे म्हटले म्हणजे नामांतच नामाचे प्रेम आहे. ताकात लोणी असतेच, फक्त ते वर दिसत नाही पण ताक घुसळल्यावर जसे ते वर येते तसे भगवंताचे नाम आपण घेतले की त्याचे प्रेम आपोआप वर येते. साध्या शब्दांचादेखील आपल्या वृत्तिवर परिणाम होऊन तो तो भाव आपल्या मनात जागृत होतो मग भगवंताच्या नामाने भगवंताचे प्रेम का येणार नाही ? आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्‍न करा. पुष्कळ दिवस एका घरात राहिल्याने त्या घराविषयी आपल्याला प्रेम येते ना ? प्रपंचाचे प्रेम आपल्याला सहवासाने आले आहे. तसे नामाच्या अखंड सहवासाने त्याचे प्रेम आपोआपच येईल. उठता बसता चालता बोलता आपण अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्‍न करावा. कोणतेही व्यसन कालांतराने पचनी पडते आणि मग मनुष्य जास्त जास्त त्याच्या आधीन जातो. अफूचे पहा दिवसेंदिवस त्या माणसाला जास्त अफू लागते. त्याप्रमाणे भगवंताच्या चिंतनाचे आपल्याला व्यसन लागले पाहिजे. कोणतीही चांगली गोष्ट साधायला कठीण असणारच; पण अगदी थोडया श्रमात पुष्कळ साधून देणारे नामासारखे दुसरे साधन नाही. म्हणून नेहमी मनाने नाम घेत असावे.

८. नामाचे प्रेम यायला एक गुरूंना ते आवडते म्हणून घ्यावे किंवा दुसरे नामातच माझे कल्याण आहे या भावनेने घ्यावे.

🍀🍂🍀🍁🍀🍂🍀🍁🍀🍂

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 II *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* II 🌷🙏🏻
----------------------------------------------
🌸!! ९ जानेवारी नाम व विकल्प !!🌸

नाम घेऊ लागले की विकल्प उठतात आणि ते घेण्याबद्दलची निष्ठा कमी होते, याला काय करावे ? अशी तक्रार आपण सर्वसाधारणपणे करतो; पण असे होण्यातच नामाचे महत्त्व प्रस्थापित होते हे आपल्या लक्षात येत नाही. मनुष्य नाम घेऊ लागला की विकल्पांना असह्य होते, आणि आता हा नाम घेऊ लागला, आता आपली धडगत नाही अशा धास्तीने त्यांची चळवळ चालू होते, आणि मनुष्याला नामापासून परावृत्त करण्याचा ते प्रयत्‍न करतात. विकल्प हे अती सूक्ष्म आहेत. त्यांचे उच्चाटन करायला त्यांच्यापर्यंत पोहोचणारा आणि तितकाच सूक्ष्म असा उपाय पाहिजे. तो उपाय म्हणजे भगवंताचे नाम. एखाद्या बिळात सर्प शिरला तर त्याला बाहेर काढण्याकरिता त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला तिथे राहणे असह्य करील असाच उपाय करणे जरूर असते. बाहेरून कितीही आरडाओरडा केला तरी त्याचा उपयोग होत नाही. बिळात धूर किंवा गरम पाणी सोडले की तो बाहेर येतो. त्याप्रमाणे नाम घेतले की विकल्प उठतात, म्हणजे विकल्पांच्या मूळ ठिकाणापर्यंत नामाची आच जाऊन पोचली असे ठरते. तर मग नाम घेऊ लागल्यावर विकल्प येऊ लागले तर गांगरून न जाता, हे सुचिन्ह आहे असे समजून विकल्पांच्या उच्चाटनाची गुरूकिल्ली मिळाली अशा जाणिवेने, जास्त आस्थेने नाम घेण्याचा निश्र्चय करावा हाच त्याला उपाय. नामाबद्दल सुरूवातीला सर्वांचीच वृत्ती साशंक असते, पण आपण सतत नाम घेत गेल्यानेच विकल्प कमी होतात. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही; आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागले की आपले काम झाले.

आपण रस्त्याने चाललो की नको ती माणसे भेटायचीच; पण आपण आपले नाम चालू ठेवावे. तसे, विकल्प आले तर नाम सोडू नये. पण गंमत अशी होते की, वाईट मनुष्य भेटला आणि आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही असे म्हटले तरी, तो मुद्दाम खाकरतो आणि आपले लक्ष वेधतो. अशा वेळी त्याच्याकडे पाहूनही आपण दुर्लक्ष करतो. त्याचप्रमाणे विकल्पांनी आपले लक्ष ओढून घेतले तर नावडीने लक्ष द्यावे पण आपले नाम सोडू नये. शंका घ्यायचीच झाली तर नाम चालू ठेवून घ्या, म्हणजे ते नामच शंकांचे निरसन करील आणि विकल्पांनाही हळूहळू पायबंद घालील.

९. पुष्कळ केलेले शंकेने व्यर्थ जाते. आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरविले की आपली वृत्ती निःशंक होतेच होते.

🍀🍂🍀🍁🍀🍂🍀🍁🍀🍂

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 II *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* II 🌷🙏🏻
----------------------------------------------
🌸!! १० जानेवारी नाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन !!🌸

संसारातील सार । आपला करा रघुवीर ॥

कलि अत्यंत मातला । नीतिकर्तव्याचा विसर पडला ॥

अनाचार होतसे फार । आता नाही रामावाचून दुजा ठाव ॥

चोराने घरफोड केले । मग जागृतीचे कारण नाही उरले ॥

म्हणून असावी सावधान वृत्ति । अखंड राखावी भगवंताची स्मृति ॥

भगवंतासी अनन्य होता । दु:खाची नाही तेथे वार्ता ॥

अभिमानवृत्ति सोडावी बरी । त्यास घडे रामसेवा खरी ॥

सरे मीपणाची उरी । ब्रह्मरूप दिसे चराचरी ॥

म्हणून ज्याने जन्माला घातले । ज्याने आजवर रक्षण केले ।

तो माझा धनी हे ठेवून चित्ती । भावे भजावा रघुपति ॥

रामाचे व्हावे आपण । राम जोडावा आपण ॥

हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण ॥

म्हणून रामाविण न मानी कोणी त्राता । धन्य त्याची माता पिता ॥

प्रपंच तसा परमात्म्यावाचून । हे जसे अलंकार सौभाग्यावाचून ॥

अलंकार सर्व घातले । पण सौभाग्यतिलक न लावले ॥

तैसे रामाविण राहणे आहे खरे ॥

ऐहिक आणि पारमार्थिक । न जाणावे एकाहून एक परते ॥

ऐहिक आणि पारमार्थिक सुख । रामावाचून नाही देख ॥

म्हणून शुध्द असावे आचरण । तसेच असावे अंत:करण ॥

त्यात भगवंताचे स्मरण । हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन ॥

रामचरणावर ठेवावा विश्वास । हेच परमार्थाचे भांडवल खास ॥

ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण । हीच परमार्थाची खरी शिकवण ॥

माझे हित भगवंताचे हाती । हीच ठेवावी मनाची प्रवृत्ति ॥

राम कर्ता ही असावी भावना । तो जे करील ते आपल्या हिताचे जाणा ॥

भाव ठेवावा रामापायी । पण व्यवहार चुकू न देई ॥

परमात्म्याचे राखणे अनुसंधान । हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाण ॥

बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगति । चित्ती असावा एक रघुपति ॥

प्रयत्‍न करणे आपल्या हाती । यश देणे भगवंताचे हाती ॥

प्रयत्‍नाला न पाहावे पुढे मागे । परि परमात्मा उभा आहे मागे । ही ठेवावी जाणीव मनामध्ये ॥

प्रपंचात दक्षतेने वागत जावे । धीर सोडू नये । भगवंताचे आधारावर निभ्रांत असावे ॥

सर्व कामधंदा घरी करी । पण चित्त लेकरांवरी ।

ऐसे जैसे करी जननी । जाण तैसे वागावे आपण ॥

काया गुंतवावी प्रपंचात । मन असावे रघुनाथात ॥

नीतिधर्माचे आचरण । पवित्र असावे अंत:करण ।

त्यात कर्तव्याची जोड पूर्ण । त्या सर्वात राखता आले अनुसंधान । तर याविण दुजा परमार्थ नाही जाण ॥

व्यवहार उत्तम प्रकारचा केला । पण परमात्मा विसरला । तो व्यवहार दु:खच देता झाला ॥

१०. असावी सावधानवृत्ति । अखंड राखावी भगवंताची स्मृति ॥

🍀🍂🍀🍁🍀🍂🍀🍁🍀🍂


🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 II *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* II 🌷🙏🏻
----------------------------------------------
🌸!! ११ जानेवारी नामाचे सूक्ष्म स्वरूप !!🌸

नुसते 'राम राम' म्हणून राम कसा भेटेल हा प्रश्न माणूस सहजच विचारतो, आणि त्याला दाखला म्हणून म्हणतो की, समजा एखादा मनुष्य 'नोकरी नोकरी' असा जप करीत खोलीत बसला, तर त्याला नोकरी मिळणे शक्य आहे का ? वरकरणी हा दाखला अगदी बेमालूम दिसतो खरा, पण थोडासा विचार केला, तर तो इथे मुळीच लागू पडत नाही, असे कळून येईल. जो दाखला द्यायचा, आणि ज्या बाबतीत तो द्यायचा, त्यांचे गुणधर्म सारखे असावे लागतात. 'रामनाम' आणि 'नोकरी' यांचे परिणाम एकमेकांविरूद्ध आहेत. 'राम राम' म्हणण्याचा शेवट रामप्राप्तीत म्हणजे स्वत:च्या विस्मरणात होत असतो; म्हणजे देहबुद्धीतून देहाच्या पलीकडे जाणे, म्हणजे स्थूलांतून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे, हा 'राम राम' म्हणण्याचा परिणाम. परंतु नोकरीचा प्रकार याच्या अगदी विरूद्ध आहे. मुळात नोकरी ही कल्पना सूक्ष्म आहे. नंतर, ती मिळावी म्हणून दहाजणांचे आर्जव करायचे, त्याच्यानंतर ती देणारा भेटायचा, आणि मग आपण ती नोकरी करायची. म्हणजे नोकरी या कल्पनेतून, सूक्ष्मातून, स्थूलात जाणे हा नोकरीचा प्रकार. पण 'राम राम' म्हणणे हा प्रकार स्थूलांतून सूक्ष्माच्याही पलीकडे जाण्याचा आहे. यावरून नोकरीचा हा दाखला इथे लागू पडत नाही हे स्पष्ट होते. दुसरी गोष्ट म्हणजे 'नोकरी नोकरी' असा जप करून नोकरी मिळणे कठीण हे तर खरेच, पण 'राम राम' म्हणून राम मिळणे कसे सोपे, किंबहुना कसे हमखास शक्य आहे हे पहा. नोकरी म्हणजे मुळात कल्पना असून, ती प्रत्यक्षात आणण्याकरिता इतर अनेक गोष्टींची कशी जुळवाजुळव करावी लागते, हे आपण आत्ताच पाहिले. तसेच, घर बांधणे ही कल्पना; ती पुरी करून ते घर सर्व बाजूंनी सुखसोयीचे आगर व्हावे या हेतूने सर्व जिनसा पैदा करून त्यात आणून ठेवणे, म्हणजेच कल्पनेतून कृतीत येण्याचा प्रकार झाला. आता हे करणे किती कष्टाचे आणि अनिश्चित आहे याचा अनुभव सर्वांना आहे. 'राम राम' म्हणण्याचे उद्दिष्ट, स्थूलांतून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हे आहे; म्हणजेच, अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण आणि भरलेले घर एकेक वस्तू फेकून देऊन रिकामे करण्यासारखे आहे. ही गोष्ट करण्याची इच्छा असल्यास कोणालाही सहज होण्यासारखी आहे. तेव्हा 'नोकरी नोकरी' म्हणून नोकरी मिळणे जितके कठीण, तितकेच 'राम राम' म्हणून राम मिळणे निश्चित आहे. सबब 'राम राम' म्हणून राम कसा भेटेल अशी शंका न घेता 'राम राम' जपावे.

मनाच्या सर्व दु:खाला कारण देहबुद्धी आहे. ती जायला उपाय एकच; प्रेमाने भगवंताचे नामस्मरण करावे. त्याच्या योगाने सर्व मल जाईल. नामस्मरणच रामाची गाठ घालून देईल. चित्तात तशी तळमळ मात्र पाहिजे. 'मी' पणा टाकावा आणि परमात्म्याचे होऊन राहावे.

११. जो नाम घेतो त्याला देहाच्या सुखदु:खाची जाणीव राहणार नाही. तो आनंदात राहील.

🍀🍂🍀🍁🍀🍂🍀🍁🍀🍂


🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 II *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* II 🌷🙏🏻
----------------------------------------------
🌸!! १२ जानेवारी नाम व भगवंत !!🌸

'राम राम' म्हणून राम कसा भेटेल या विचारण्यात काहीच अर्थ नाही. उलट असे म्हणता येईल की, 'राम राम' म्हटल्याशिवाय राम भेटणेच शक्य नाही. व्यवहारातही आपला हाच अनुभव आहे. समजा, आपल्याला एका गावाला जायचे आहे म्हणून आपण स्टेशनवर गेलो, आणि जिथे जायचे आहे त्याचे सर्व वर्णन केले पण नाव सांगता आले नाही, तर आपल्याला तिकीट मिळेल का ? उलट, त्या गावातली माहिती काही नाही पण नाव ठाऊक आहे, तर आपल्याला तिकीट मिळून तिथे जाता येईल. म्हणजे ठिकाण माहितीचे आहे पण नाव तेवढेच न आठवले तर काहीही उपयोग होत नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले तर काही उपयोग होत नाही; म्हणून नाम घेणेच जरूर आहे. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी.

भगवंताच्या नामाची गरज दोन तर्‍हेने आहे; एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी, आणि दुसरी, भगवंताच्या प्राप्तीसाठी. खायला-प्यायला पोटभर, बायकोमुले, घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरीसुध्दा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही. याचा अर्थ, दुःखाचे खरे स्थान कुठे आहे हे कळत नाही. ते कळण्याकरिता भगवंताच्या नामाची गरज आहे. भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरूरी आहे; नंतर, भगवंतावाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे; आणि शेवटी, भगवंताच्या दर्शनानंतर नाम संवयीने आपोआप येते. एकूण, आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचे नामच शिल्लक राहते. जो नामस्मरण करील आणि त्याचे अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल. नामाकरिता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल. नाम घेताना जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे असा भरवसा ठेवा.

भगवंताचे नाम हीच सच्चिदानंदस्वरूप सद्‍वस्तू होय. भगवंताच्या नामात जो स्वत:ला विसरला तो खरा जीवनमुक्त होय. जे काय साधायचे ते हेच. बाकीच्या गोष्टी स्वप्नासारख्या समजाव्यात. त्या प्रचीतीस येतात पण नसतात. देहाशी असलेले आपले तादात्म्य हे एक प्रकारच्या सवयीने आणि अभ्यासानेच झाले आहे. याच्या उलट अभ्यास करून भगवंताचे चिंतन केले तर जसे आज देहाशी तादात्म्य आहे त्याचप्रमाणे भगवंताशी आपले तादात्म्य होईल.

१२. सकाळी उठताना रात्री निजताना जेवायच्या आधी नाम घ्यायचेच आणि भगवंताची आठवण करायचीच असा नियम करावा. तो आयुष्यात फार उपयोगी पडेल.

🍀🍂🍀🍁🍀🍂🍀🍁🍀🍂


🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 II *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* II 🌷🙏🏻
----------------------------------------------
🌸!! १३ जानेवारी नाम आणि सत्कर्म !!🌸

नाम हा सत्कर्माचा पाया आहे तसाच कळसही आहे. भगवंताच्या स्मरणात केलेले सत्कर्म या सदरात पडू शकते; भगवंताच्या विस्मरणात केलेले कर्म सत्कर्म ठरू शकत नाही. समजा एखादा मनुष्य नुसते तोंडाने 'राम राम' म्हणतो आहे परंतु भगवंताच्या स्मरणात नाही, तर मग 'राम राम' म्हणण्याची त्याची क्रिया सत्कर्म म्हणता येईल का ? वास्तविक, नाम हे स्वतःसिद्ध असल्याने ते जाणता वा अजाणता म्हटले तरी ते सत्कर्म याच सदरात पडते, कारण 'जेथे माझे नाम तेथे मी पुरूषोत्तम' असे भगवंताचेच वचन आहे. म्हणून नामाचा उच्चार आणि भगवंत या दोन्ही गोष्टी निराळया असूच शकत नाहीत. मुखाने नाम घेणाऱ्याचे लक्ष भगवंताकडे असो वा नसो, ते सत्कृत्य याच सदरात पडते. इतर कर्मे आणि नाम घेण्याचे कर्म यांत जो मोठा फरक आहे तो हाच की इतर कर्मांना पूर्णत्व किंवा सत्यत्व नामाने येते, तर उलटपक्षी नाम आणि अपूर्णत्व या गोष्टी एकत्र संभवतच नाहीत. म्हणून नाम भगवंताच्या स्मरणात घेतले किंवा कसे हा प्रश्नच उद्‍भवत नाही. किंबहुना नाम मुखी आले की सत्कर्मे होऊच लागतात. मूल झाले की मुलाच्या आईला पान्हा फुटणे, मुलाचे लाड करणे, त्याच्यावर सर्वतोपरीने प्रेम करणे, या गोष्टी जशा न शिकविता सहजच होतात, तशीच स्थिती नाम घेणाराची सत्कर्माच्या बाबतीत होते. इतकेच नव्हे तर, त्या आईला जर म्हटले की तू मुलाला जवळ ठेव, पण त्याच्यावर प्रेम वगैरे काही करू नकोस, तर ते जसे तिला शक्य नाही, त्याचप्रमाणे नाम घेणाराला सत्कर्मे टाळू म्हटले तरी टाळता येणार नाहीत. सत्कर्मे फळाला आली असे केव्हा म्हणता येईल, तर भगवंताचे नाम मुखी येईल तेव्हाच.

परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, "तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू प्रपंच अती दक्षतेने कर, प्रयत्‍नाला कधी मागे पाहू नकोस, पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस, आणि मी जे सांगतो ते औषध घे, ते तुला सर्व रोगांतून मुक्त करील; आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे 'नाम' हे होय." त्या नामाचा खरोखर तुम्ही अभ्यास करा. तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा की नामाशिवाय जगणे हे खरे नाही. नामाशिवाय जगू नये असे मला खरोखर मनापासून वाटते. नामावरची निष्ठा कसे काम करते हे निष्ठेने नाम घेणारालाच कळेल. नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्या मागे परमात्मा उभा राहिला हे अगदी सत्य सत्य, त्रिवाचा सत्य सांगतो. म्हणून आवडीने आणि प्रेमाने भगवंताचे नाम घ्या, एकदा तरी त्याला कळकळीने 'रामा !' अशी हाक मारा, की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावेसे वाटले पाहिजे.

१३. सत्कर्माचा शेवट भगवंताच्या नामाचे प्रेम उत्पन्न होण्यातच होणे जरूर आहे.

🍀🍂🍀🍁🍀🍂🍀🍁🍀🍂


🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 II *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* II 🌷🙏🏻
----------------------------------------------
🌸!! १४ जानेवारी नाम घेण्याला काहीही आड येत नाही !!🌸

आपण असे पाहू की नामात प्रेम येण्याकरता एक एक सत्कर्म करीत राहणे सुलभ, की ते नामच विचाराने, सर्व संतांनी कळवळ्याने सांगितले आहे म्हणून, जरूर तर बळजबरीनेसुद्धा घेत राहणे हे सुलभ. समजा एक यंत्र आहे त्यात पुष्कळ चक्रे आहेत, आणि ते यंत्र चालू करण्याचा हेतू धरला आहे. आता एखाद्याने त्यातले एखादेच चक्र चालू करू म्हटले तर ते चालू होईलच असा भरवसा नाही. पण त्या सर्व चक्रांचा संबंध असणारी कळ आपण दाबली तर मात्र बिनतक्रार आणि अत्यंत अल्प प्रयासाने ते य्रंत्र सहज चालू करता येईल. त्याप्रमाणे, नाम ही कळ जर धरली तर सत्कर्मरूपी सर्व चक्रे एकदम फिरू लागून आपले काम निश्चितपणे आणि सुलभपणे होईल. म्हणून, हमखास आणि सहज रीतीने काम व्हावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लागावे. नाम घ्यायचे एकदा पक्के ठरविले म्हणजे काहीही आड येत नाही. व्यवहारात आपण पाहतोच की एखादी गोष्ट समर्थनीय नसली तरी करायचा निश्चय केला की मनुष्य ती करतोच. मग नाम घेण्याचा निश्चय केला तर का नाही होणार ? काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही; तर मग ते घेण्यात विलंब किंवा चालढकल करण्यात काय अर्थ आहे ? म्हणून कोणत्याही तऱ्हेच्या शंकाकुशंका न घेता कशाही तऱ्हेने पण नाम घेत राहावे हे उत्तम; म्हणजे विनाकारण काळ फुकट घालविला अशी पश्चातापाची वेळ येणार नाही.

जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरले आहे. त्या वस्तू आपण पाहिल्या किंवा नुसत्या ऐकल्या तरी हव्याशा वाटतात; आणि त्या मिळविण्याचा आपण प्रयत्‍न करतो. म्हणून देवाजवळ आपण अशी प्रार्थना करावी की, 'देवा मोहक वस्तू मला दाखवूच नकोस, कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी फसेन. देवा, माझे खरे हित आहे तेच मला दिसो, तेच मी ऐको, त्याचेच मला स्मरण होवो, आणि त्याचीच मला गोडी लागो.

प्रल्हाद द्रौपदी यांसारख्या भक्तांनी देवाजवळ काय मागितले ? तेच आपण मागावे, आणि त्यांनी निष्ठा ठेवली तशीच आपणही ठेवावी. त्यांच्या ठिकाणी जसे वैराग्य होते, तसे आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्‍न करावा. प्रयत्‍न करीत असताना प्रथम चुका होतील पण त्या झाल्या तर पश्चाताप व्हावा. 'देवा, मी फार दोषी, अपराधी आहे, मला क्षमा कर आणि तुझ्या कृपेला पात्र कर. पश्चाताप खराच झाला तर राम कृपा करीलच. मुखाने नाम घ्यावे, हाताने प्रपंचाचे काम करावे, आणि अंत:करणात समाधान ठेवावे.

१४. जो नाम घेऊ लागेल त्याचे मन बाहेर धावण्याचे हळूहळू कमी होते.

🍀🍂🍀🍁🍀🍂🍀🍁🍀🍂


🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 II *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* II 🌷🙏🏻
----------------------------------------------
🌸!! १६ जानेवारी नामाकरताच नाम घ्यावे !!🌸

नाम हे निसरडयासारखे आहे. निसरडयावर गवत वाढत नाही आणि त्याच्यावर पाय पडला तर घसरतो त्याप्रमाणे नाम आपल्यावर उपाधी ठरू देत नाही. त्याला कोणत्याही उपकरणाची गरज लागत नाही. रोगी-निरोगी, विद्वान-अडाणी, श्रीमंत-गरीब, लहान-थोर, स्त्री-पुरूष, जात-गोत, यांपैकी कोणतीही गोष्ट असली तरी अडत नाही, नसली तरीही अडत नाही. नामाशिवाय दुसर्‍या कोणत्याही साधनाला शक्ती, बळ, पैसा वगैरे कोणत्या तरी गोष्टीची मदत लागते. असे हे अत्यंत उपाधिरहित असलेले नाम आपणही अत्यंत उपाधिरहित होऊन घेतले तरच त्यात आपल्याला प्रेम येईल. आपण उपाधिरहित होणे म्हणजे नाम हे केवळ नामाकरिताच, स्वत:च्या कल्याणाकरिताच घेणे, जगातल्या दुसर्‍या कशाहीकरिता न घेणे. आपण जर ते सकाम बुद्धीने घेतले तर इच्छित कार्यभागही साध्य होत नाही आणि आपले कल्याणही साधत नाही. सकाम नाम घेणे हे किती वाईट आहे हे सांगणे फार कठीण आहे. असे पहा की स्त्री ही अत्यंत पवित्र आहे, कारण देव, संत यांसारख्या विभूतिही तिच्यापोटी जन्म घेतात; अशा स्त्रियांना पळवून नेऊन अनीतीने वागायला भाग पाडून त्यावर पैसे मिळविण्याचा धंदा काही लोक करतात ही किती निंद्य गोष्ट आहे बरे ! पण सकाम नाम घेणे ही गोष्ट त्याच्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक निंद्य आहे. म्हणून नाम हे नामाकरिताच घ्यावे, त्याचा संबंध आपल्या इच्छा-अपेक्षांशी ठेवू नये. नामाकरिता नाम घेतल्याने मन आपोआप अंतर्मुख होऊन जाते. नामाच्या साहाय्याने मन अंतर्मुख केल्यावर आनंद सापडतो. आपल्या हृदयातच तो सापडतो.

आपण तीन गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पहिली, आचरण अगदी शुध्द ठेवावे; दुसरी, नामाला कधीही सोडू नये; आणि तिसरी, माझा सांभाळ करणारा कुणीतरी -म्हणजे सदगुरू - आहे ही जाणीव जागृत ठेवावी. प्रत्येक माणसाला कशाचीतरी विशेष आवड असते; त्या आवडीमध्ये राहावे आणि त्यात जबरीने नाम घ्यावे. आत्मज्ञान व्हावे म्हणून त्याच्या मागे लागले तर ते लवकर होत नाही. भगवंताकडे लक्ष लागले म्हणजे ते आपोआप होते. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते. श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते पण केशर किती थोडे घालावे लागते! तसे भगवंताच्या नामाचे आहे. रोज थोडे पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावे ते फार काम करील. भगवंत हा सर्वसत्ताधीश खरा पण एका बाबतीत तो लुळापांगळा होतो व सहज अडकतो. भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळांत अडकतो तीच स्थिती नामाच्या बाबतीत भगवंताची होते.

१६. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन आहे.

🍀🍂🍀🍁🍀🍂🍀🍁🍀🍂


🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 II *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* II 🌷🙏🏻
----------------------------------------------
🌸!! १७ जानेवारी नाम व इतर साधने !!🌸

नवविधा भक्तीचा श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण इत्यादि क्रम हा सृष्टिक्रमाला धरून आहे. मनुष्यप्राणी जन्माला आला की शिकायला सुरूवात करतो ती श्रवणापासूनच. मुके लोक बहिरे असलेच पाहिजेत, कारण श्रवण न झाल्याकारणानेच त्यांना बोलता येत नाही. मनुष्यप्राणी ज्या देशात जन्माला येतो त्या देशाची भाषा बोलतो. म्हणून श्रवणानंतर कीर्तन म्हणजे बोलणे; आणि बोलणे झाल्यानंतर कृती म्हणजे नामस्मरण असा स्वाभाविक क्रम लागतो. नामस्मरण होऊ लागले की आपले काम झाले कारण पुढल्या सर्व भक्ती नामस्मरणात येतात. त्यांच्याकरिता निराळी खटपट करण्याचे कारण नाही. एका इसमाला दुसर्‍या एकाला भेटण्यासाठी नऊ मैल अंतरावर असलेल्या ठिकाणी जायचे होते म्हणून तो घरातून निघाला. पण तीन मैल चालून गेल्यावर ज्याला भेटायचे होते तोच मनुष्य त्याला भेटला. अशा वेळी आपले काम झाले म्हणून तो जसा पुढे जाण्याच्या खटपटीत पडणार नाही, त्याचप्रमाणे तिसरी म्हणजे नामस्मरणभक्ती केल्याने पुढल्या सहाही प्रकारच्या भक्तींचे फळ मिळते.

भगवंताच्या स्मरणात सर्वस्व आहे ही अगदी खूणगाठ बांधून ठेवा. भगवंताचे स्मरण कसे आहे ? बाकी सगळया गोष्टी, सगळी सत्कर्मे, दानधर्म म्हणा, तीर्थयात्रा म्हणा, पारायण म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या इंद्रियांसारख्या आहेत. ही सगळी इंद्रिये मानली तर भगवंताचे स्मरण हा प्राण आहे. बाकीची सर्व इंद्रिये जरी असली आणि प्राण नसेल तर इंद्रियांचा काही उपयोग नाही. तेव्हा नामस्मरण हा प्राण समजून तुम्ही प्रपंचात सुखी राहा. कर्तव्याला चुकू नका, कर्तव्य करीत असताना परमात्म्याचे स्मरण राखा; मुखामध्ये राम असू द्या. भक्ताने उपाधी बेताची, म्हणजे गरजेपुरतीच ठेवावी. भगवंताचे अनुसंधान न चुकेल एवढीच उपाधी असावी. तसेच पचेल तेवढेच म्हणजे आनंदाने जेवढे करवेल तितकेच नामस्मरण करावे. ते कष्टाने करू नये कारण त्यापासून आनंद होणार नाही. नामात प्रेम येणे जरूर आहे, याकरिता ते नाम अत्यंत आवडीने आणि त्याच्याशिवाय दुसरे काही साधायचे नाही आहे अशा भावनेने घेतले पाहिजे, म्हणजे त्यात प्रेम येईल. नामात प्रेम येणे ही फार उच्च कोटीची स्थिती आहे. ती अगदी सहजासहजी प्राप्त होणारी नाही. म्हणून यातले मर्म ओळखून योग्य तर्‍हेने आणि चिकाटीने सतत नामस्मरणाचा अभ्यास ठेवणे जरूर आहे. भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळले.

१७. नामस्मरणाची बुध्दी झाली की आपले काम झाले.

🍀🍂🍀🍁🍀🍂🍀🍁🍀🍂


🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 II *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* II 🌷🙏🏻
----------------------------------------------
🌸!! १८ जानेवारी नाम निष्ठेने घ्यावे !!🌸

नाम श्रध्देने घेणे म्हणजे काय ? तर आपल्या गुरूने किंवा ज्याच्याबद्दल आपली पूज्य भावना असते अशा व्यक्तीने सांगितले म्हणून घेणे. अशा श्रद्धेने नाम घेणार्‍याच्या मनात शंका येत नाही. ही स्थिती फार भाग्याची पण तितकीच दुर्मिळ. निष्ठेने नाम घेणे म्हणजे शंकारहित नाम घेणे. शंका अनेक तर्‍हेच्या असतात. नाम घेताना भगवंताकडे लक्ष नसले तर त्या नामाचा उपयोग आहे की नाही, नाम घेताना बैठक कोणती असावी, दृष्टि कशी असावी, शुचिर्भूतपणेच नाम घ्यावे किंवा कसे, अशा तर्‍हेच्या अनेक शंका मनात येतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, आपण जे नाम घेतो ते भगवंतापर्यंत पोहोचते की नाही, ह्या एका शंकेत सर्व शंकांचा समावेश होतो. भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच असल्याने त्या दोहोंच्या आड काहीच येऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चाललो असताना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले गेले तर तो लगेच मागे वळून बघतो. ही जर मनुष्याची स्थिती तर भगवंताच्या बाबतीत त्याचे नाव त्याच्यापर्यंत पोहोचत नाही हे कसे शक्य आहे? खरे पाहिले तर भगवंताचे नाव त्याच्याच कृपेने आपल्या मुखात येते; म्हणजे त्याचे नाव तोच घेत असतो; मग नाम भगवंतापर्यंत पोहोचते की नाही ह्या शंकेला वावच कोठे राहिला ? समजा दोन माणसे जेवायला बसली. त्यांतल्या एकाच्या मनात काही विचार घोळत असून त्याचे जेवणाकडे लक्ष नव्हते, पण हाताने तोंडात एकेक घास घालण्याचे काम चालू होते. दुसरा इसम मात्र लक्षपूर्वक जेवण जेवीत होता. दोघेही जेवून उठले. ह्यात उपाशी कोण राहिला ? दोघांचीही पोटे भरलीच ! तसे नाम घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही असे कसे होईल ?

समजा आपण परगावच्या एका अनोळखी इसमाला पत्र लिहून त्याला बोलाविले; तो आला आणि त्याने सांगितले की, 'तुम्ही ज्याला पत्र पाठविले तोच मी', तर त्याच्या वचनावर विश्वास ठेवून आपण त्याला जवळ करतो. तसे, भगवंताने सांगितले आहे की 'जेथे माझे नाम तेथे मी पुरूषोत्तम'; तर मग या वचनावर विश्वास ठेवून नाम घ्यावे आणि त्यातच त्याला पहावे, असे का करता येऊ नये ? हीच श्रध्दा. आपण ज्याचे पोटी जन्माला आलो त्याचेच नाव आपल्या पुढे लावतो तसे भगवंताच्या बाबतीत करावे. त्याचेच नावाने जगावे; म्हणजे माझा सर्व कर्ता, रक्षिता तो एकच असून त्याच्याशिवाय माझे या जगात दुसरे कोणीही नाही, या भावनेने राहावे. असा जो भगवंताचा होतो त्याचे महत्व भगवंत स्वत:पेक्षाही वाढवतो.

१८. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी.

🍀🍂🍀🍁🍀🍂🍀🍁🍀🍂

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 II *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* II 🌷🙏🏻
----------------------------------------------
🌸!! १९ जानेवारी नाम व प्रारब्धभोग !!🌸

नामाचा संबंध प्रारब्धाशी कसा आहे असे पुष्कळ लोक विचारतात. हा प्रश्न एका दृष्टीने फार महत्वाचा आहे. बहुतेक लोक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात. देहाचे सुखदु:ख हे माझेच सुखदु:ख आहे किंबहुना देह सुखी तर मी सुखी आणि देह दु:खी तर मी दु:खी अशी सामान्य मनुष्याची अवस्था असते. बरे प्रारब्धाचे भोग हे आजपर्यंत कोणालाही चुकले नाहीत. मग कसे करावे ? इथे असे लक्षात ठेवावे की प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते; म्हणून ज्याची देहबुध्दी कमी झाली तो देहाच्या सुखदु:खाने सुखी वा दु:खी होत नाही. नामाने देहबुध्दी कमी होते. म्हणून नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील आनंदात असतो. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहात नाही. नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे. पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते. वाया गेलेल्या माणसांना नाम तारते. नाम हा सर्व प्रार्थनांचा सेवेचा पूजेचा राजा आहे.

आनंदमय अशा भगवंताचे सान्निध्य नामाने लाभते आणि त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही; किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते. सर्व काळी सर्व ठिकाणी सर्व अवस्थांमध्ये कोणालाही करता येण्यासारखे नाम हेच एक साधन आहे. नामाला उपाधी अत्यंत कमी असल्याने निरूपाधिक भगवंताशी नाते जोडायला नामासारखे साधन नाही. खरोखर किती प्रकारांनी तुम्हांला मी सांगू ! अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात. अखंड नामात जगणे यालाच पराभक्ती म्हणतात. जो नामात अखंड गुंतला त्यालाच संत म्हणतात. नामात प्रेम येणे ही संतांची खरी खूणच आहे. तेव्हा माझे एवढे ऐका: नामाला कदापिही विसरू नका. प्रारब्धाच्या भोगांना न कंटाळता भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले असेल त्यामध्ये समाधान माना पण केव्हाही त्याच्या नामाला विसरू नका. नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात. देहबुध्दी कमी होणे हेच पुण्य होय, आणि ते नामाने प्राप्त होते. नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे हेच कलीचे मुख्य लक्षण होय. त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती नाही. नामाने पुण्यशरीर बनते. ज्याच्या अंतरात नाम असते तिथे भगवंताला यावे लागल्याने त्याच्या शरीरात सत्त्वगुणाची वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो. देह प्रारब्धावर टाकून आणि आपण त्याहून निराळे राहून जे होईल त्यात आनंद मानावा. भोग प्रारब्धाने येतात असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात असे म्हटले की समाधान मिळेल.

१९. भगवंताला स्मरून काम करीत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्या इच्छेनेच आहे असे समजून काम करावे. जो असे करील त्याला समाधान झालेच पाहिजे.

🍀🍂🍀🍁🍀🍂🍀🍁🍀🍂

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 II *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* II 🌷🙏🏻
----------------------------------------------
🌸 !! २३ जानेवारी नामस्मरणरूपी शेताची मशागत !! 🌸

नामस्मरणरूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी प्रथमत: सदाचरणाची आवश्यकता आहे. सदाचरण हे शेताचे रक्षण करण्याकरिता लागणार्‍या कुंपणासारखे आहे. दुसरी गोष्ट, शुद्ध अंतःकरण म्हणजे उत्तम काळी भुसभुशीत जमीन. या जमिनीमधले दगड, हरळी, वगैरे काढून ती साफ करावी; म्हणजेच, अंतःकरणात कोणाबद्दलही द्वेष, मत्सर, वगैरे ठेवू नये. शुद्ध अंतःकरणानंतर नामस्मरणाचे महत्त्व आहे. नामस्मरण हे त्या जमिनीत पेरण्याचे बी आहे. हे बी किडके नसावे; म्हणजे, नाम सकाम नसावे. उत्तम बीज म्हणजे 'नामाकरिताच नाम' हे आहे. त्यानंतर तीर्थयात्रा, संतांचे आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी, यांची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी पाटाच्या पाण्यासारख्या आहेत. यामुळे शेत चांगले यायला मदत होते. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवत्‌कृपा होय. भगवत्‌कृपा ही पावसाच्या पाण्यासारखी आहे. पाटाच्या पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याची गोष्ट काही और आहे. पण तो पडणे न पडणे आपल्या हाती नाही. शेताला लावण्याकरिता पाटाचे पाणी एखादी विहीर, तलाव किंवा नदी यामधून नेता येणे शक्य असते; परंतु पावसाच्या बाबतीत कोणाला काहीच करता येत नाही. त्यामुळे एखाद्याने शेताची उत्तम निगा राखली, उत्तम बी पेरले, तरी पावसाच्या अभावी पीक न येण्याचा संभव असतो. नामस्मरणरूपी शेताचे एक वैशिष्टय आहे. ते हे की, त्याच्या अंगी लोहचुंबकासारखी आकर्षणशक्ती आहे. म्हणून हे शेत वाया गेले असे कधीच होत नाही. आपण असे पाहू की, दोन शेतकरी आहेत; एक कर्तव्यकर्म म्हणून वेळ झाली की आपल्या शेताची मशागत करणारा आहे, तर दुसरा आळशी म्हणजे मशागत न करणारा आहे. आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा, ज्याने मशागत केली त्याचे शेत उत्तम वाढेल, पण दुसऱ्याचे वाढणार नाही. भगवंताच्या कृपेने जो पाऊस पडणार, त्याचा एकाला फायदा मिळेल; तो दुसर्‍याला मिळणार नाही. म्हणजे जो नियम प्रपंचात लागू तोच परमार्थात लागू. भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करीत असते. ज्याने ज्या प्रमाणात चित्तशुद्धी केली असेल, त्या प्रमाणात त्याला फायदा होईल, दुसर्‍याला नाही होणार. भगवंत किंवा संत समदृष्टी असतात ते असे. भगवंत निःपक्षपाती आहे. त्याच्यापाशी कोणताही भेद नाही. आपण तयार झालो की त्याची कृपा आपोआप होते. कृपेला योग्य अशी भावना तयार करणे आपले काम आहे. संतांनी नुसते आपल्याला सांगून भागत नाही, आपण काय करायला पाहिजे हे कळून आपण ते स्वतः करायला पाहिजे. त्यांच्या ठिकाणी जर विषमता दिसली तर तिचा उगम किंवा कारण आपल्यातच आहे हेच यावरून दिसते.

२३. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल.

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿


🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 II *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* II 🌷🙏🏻
----------------------------------------------
🌸 !! २४ जानेवारी नामसाधन कसे करावे ? !! 🌸

नामाचे साधन कसे करावे ? एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोक पडेल, आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल; त्याप्रमाणे, केव्हातरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनेमाने, ठराविक वेळी, आणि शक्य तर ठराविक स्थळी, जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. जात्याला दोन पेठी असतात; त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते. पण जर दोन्ही पेठी फिरत राहिली तर दळण दळले न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचे शरीर आणि मन अशा दोन पेठी आहेत. त्यांतले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेठे आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे, आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो. प्रारब्धरूपी खुंटा देहरूपी पेठयात बसून तो त्याला फिरवतो, आणि मनरूपी पेठे स्थिर असते. देह प्रारब्धावर सोडावा, आणि मन भगवंताच्या स्मरणात स्थिर ठेवावे, याहून नामाचे साधन दुसरे काय ? हे साधन अमक्यालाच साधेल असे नाही, तर ते कोणालाही साधेल. गरिबाला गरिबीचे दु:ख होते म्हणून साधत नाही, तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाही; विद्वानाला विद्येचा अभिमान होतो म्हणून साधत नाही, तर अडाण्याला काय करावे हे समजत नाही म्हणून साधत नाही. साशंक वृत्तीने कितीही साधन केले, कितीही नामस्मरण केले, तरी कधी समाधान होणार नाही.

नीतिधर्माचे आचरण, शास्त्रशुध्द वर्तन, शुद्ध अंतःकरण, आणि भगवंताचे स्मरण, इतक्या गोष्टी असतील तरच साधक शेवटपर्यंत पोहोचेल; आणि शेवटपर्यंत तो पोहोचला तरच फायदा. 'घरी पोहोचल्यावर पत्र लिहा' असे म्हणतात, याचा अर्थ हाच आहे. प्रपंच करीत असताना वाईट विचार मनात येतात, त्याचप्रमाणे परमार्थ करीत असतानाही वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे कारण नाही. ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाम घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे. जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृति आहे तिथेच समाधानाची प्राप्ती होते. 'भगवंता, मी तुझा आहे' असे रात्रंदिवस म्हणत गेल्याने भगवंत प्रकट होत जाईल; आणि भगवंत जितका प्रकट होत जाईल तितके 'मी' पणाचे दडपण आपोआप कमी होत जाईल.

२४. प्रारब्धाची व ग्रहांची गती देहापर्यंतच आहे. मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही.

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿


🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 II *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* II 🌷🙏🏻
----------------------------------------------
🌸 !! २५ जानेवारी अनुसंधानासाठी सतत नामस्मरण करावे !! 🌸

नामस्मरण हे प्रपंचाकरिता, म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही, तर प्रपंचाची आसक्ति कमी करण्यासाठी आहे. तरी पण त्याने प्रपंच बिघडणार नाही. जे होईल ते आपल्या बऱ्याकरिता आहे असे मानून परमात्म्यावर विश्वास ठेवून राहावे. एक गृहस्थ मला भेटले तेव्हा म्हणाले, 'मी रिकाम्या वेळात नामस्मरण करतो.' त्यावर मी म्हटले,"सार्‍या जन्मात महत्त्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ असेल तर तो हाच; त्याला तुम्ही रिकामा वेळ कसा म्हणता ?" पुढे ते म्हणाले, "प्रारब्धाचे भोग काही केल्या टळत नाहीत, ते भोगावेच लागतात, असे सर्व संत सांगतात. हे जर खरे, तर प्रारब्धाचे भोग आपण भोगत असताना त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची काय गरज आहे ?" खरोखर हा प्रश्न अगदी बरोबर आहे. आपल्या कर्माचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात हे खरे. पण भोग आले की, आपल्या मनाला चैन पडत नाही, तिथे मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतवून ठेवले की आपले समाधान टिकते. आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये, 'भगवंताच्या इच्छेने घडायचे ते घडते' असे मानणे, किंवा 'भगवंत चांगले करील' असा विश्वास ठेवून वागणे, हेच सोपे जाईल. हे दिसायला साधे दिसले तरी यात फार मोठे मर्म साठविले आहे हे ध्यानात धरा. "भगवंताच्या इच्छेने घडणार ते घडू द्यावे" अशी निष्ठा उत्पन्न व्हायला त्याचे अनुसंधान सतत ठेवले पाहिजे. "आहे त्यात समाधान, आणि भगवंताचे अनुसंधान," एवढीच सदगुरूची आज्ञा असते. दुसर्‍याने आपल्याला दु:ख दिले असता आपले अनुसंधान चुकते ही त्याची नव्हे, आपली चूक आहे.

'विषय कसा सुटेल ? मन एकाग्र कसे होईल ?' हे न कळले तरी चालेल. सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीचा, म्हणजे अनुसंधानाचा, अभ्यास करावा. एक भगवंताचे अनुसंधान ठेवले की सर्व गुण आपोआपच वाढतील; ते कसे, तर शरीराचे अवयव सारख्या प्रमाणात वाढतात तसे. झाडाच्या मुळाला पाणी घातले की, त्याच्या सर्व भागांना ते पोहोचते, तसे भगवंताचा विसर पडू न दिला तर सर्व काही बरोबर होते. "अज्ञानाच्या अंधकाराने दुःख भोगत असताना तू माझे स्मरण, माझे अनुसंधान ठेव, म्हणजे तुला पुढे उजेड दिसेल," असे गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णच अर्जुनाला सुचवीत आहेत. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे, तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे. ज्याचे अनुसंधान अखंड टिकले, त्याचे खाणे, पिणे, उठणे, बसणे, वगैरे सर्व क्रिया भगवंताची सेवाच बनतात.

२५. भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय. त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करू या.

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿



🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 II *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* II 🌷🙏🏻
----------------------------------------------
🌸 !! २६ जानेवारी अंतकाळ साधण्यासाठी नामस्मरण !! 🌸

अंतकाळी नामस्मरण होणे म्हणजे अंतकाळ साधणे; आणि हा साधण्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे. अंतकाळ साधण्यासाठीच जगावे. भगवंत जिथे राहतो तेच आपले खरे घर आहे. सध्या आपण राहतो ते भाडयाचे घर आहे. भाडयाचे घर सोडून स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला जाताना जसा आनंद वाटतो, तसाच शरीर सोडताना वाटायला पाहिजे. भगवंताचे घर तेच आपले घर आहे, याची खात्री झाली म्हणजे ते जमेल. त्यासाठी आपण सतत भगवंताच्या नामात राहावे. "मला तू आपला म्हण, माझे मन तुझ्या चरणी अर्पण केले, आता मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो," असे मागावे. परमेश्वर आपल्या मागेपुढे आहे असे अखंड मानावे. भगवंताचे स्मरण करणे, म्हणजे जे काही आपल्या हातून घडते आहे ते त्याच्याच इच्छेने घडते आहे असे समजणे. प्रपंच हा देवाचा मानून अभिमान रहितपणे तो करणे, हा परमार्थ; आणि परमात्म्यावाचून आपल्याला कोणी नाही याचा दृढनिश्चय होणे याचे नाव ज्ञान. हे ज्ञान बाणले म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने परमात्मप्राप्तीच्या मार्गाला म्हणजे साधनाला लागला. या साधनाने परमात्म्यावाचून दुसरे काही आवडेनासे होते; आणि ही जी अत्यंत आवड तिलाच भक्ती म्हणतात. या भक्तीची परिपूर्णता अंतकाळ साधण्यात होते; त्यासाठी सतत नामस्मरण किंवा अखंड अनुसंधान हेच एकमेव साधन सांगितले आहे. अंतकाळी ज्याने नाम घेतले त्याच्या विषयवासना मेल्या असे नसते; तो काही एकदम मुक्त होत नाही, पण पुढच्या जन्मी तो अती सात्त्विक म्हणून जन्माला येईल. सात्त्विक म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी वृत्ती असणारा होय.

साधन प्राणाबरोबर असावे; प्राण जसे अभिमानरहित, अखंड चालतात त्याप्रमाणे साधन अभिमानरहित, अखंड चालावे. ते 'करता' कामा नये; 'करणे' म्हणजे अभिमान आला. सहज प्राणाबरोबर झाले म्हणजे अखंड चाललेलेच असते. प्रपंचातली तळमळ सोडून वागावे. गुरूआज्ञेत असावे. अनंत जन्मांचा देहाशी सहवास, म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी होते; तसाच नामाचा सहवास पुष्कळ करावा, म्हणजे विषयाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते. योगात कष्ट फार, या युगात तो साधणे अशक्यप्रायच; आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो. भक्तीत कष्ट नसतात, आणि ती करताना अभिमान आपोआप गळत जातो. योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्तकपुत्राप्रमाणे आहेत, तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या औरस मुलाप्रमाणे आहे. भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती, हेच खरे अनुसंधान, हाच खरा परमार्थ, आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे.

२६. नुसते देहाने तीर्थस्नान, पूजापाठ, वगैरे करून परमार्थ घडत नाही; आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे.

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿


🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌸 II *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* II 🌸🙏🏻
----------------------------------------------
🌷!! २७ जानेवारी नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग आहे !! 🌷

सर्व साधनांत श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे. पण त्याचे महत्त्व कळत नाही. ते कळायला खरोखर भगवत्‌कृपाच पाहिजे. आपल्या शरीरात मुख्य जसे हृदय, आणि बाकीचे अवयव गौण आहेत, तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरण हे आहे आणि दुसरी साधने गौण आहेत. नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. आपले जीवन देवाच्या हाती आहे, आणि देव नामाच्या स्वाधीन आहे हे पक्के लक्षात ठेवा.

योगात, योग करीपर्यंतच समाधान असते; पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते. स्वतः निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण उपासना होत नाही. तेज दिसणे, नाद ऐकणे, या सर्व गोष्टी गुणातच नाही का आल्या ? निर्गुण व्हायला देहबुद्धी सुटायला पाहिजे. सर्वव्यापी परमेश्वराला सर्वांभूतीं पाहणे ही निर्गुण उपासनाच होय. योग नामस्मरणाला पोषक तितकाच करावा; केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये. योग नामस्मरणाला पोषक आहे, पण नामस्मरण योगाच्या पलीकडे आहे; म्हणून नामस्मरणात योग येतो, योगात नामस्मरण येत नाही. सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे. नामाचे साधन हे जलद गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे, ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग होय. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल. तुकारामबुवांची वाचा त्यांना अनावर झाली, ती सारखी नाम घेऊ लागली; याचा अर्थ असा की, त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले. गाडी उताराला लागली की जशी अतिवेगात येते आणि आवरत नाही, तसे हे आहे. आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा होय.

चार माणसे होती, त्या सर्वांना एकच रोग झाला होता. पण त्यांची सांपत्तिक स्थिती सारखी नव्हती. वैद्याने त्यांपैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसात घ्यायला सांगितले, त्याच्यापेक्षा पैसेवाल्याला तेच औषध मधात घ्यायला सांगितले, त्याच्याहीपेक्षा पैसेवाल्याला तेच औषध केशरात घ्यायला सांगितले, आणि सर्वात जो श्रीमंत होता त्याला तेच औषध कस्तुरीत घ्यायला सांगितले. त्याचप्रमाणे, ज्याचा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे. नाम नुसते तोंडाने घ्यावे, नाम श्रद्धेने घ्यावे, नाम वृत्ती सांभाळून घ्यावे, नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही, अशा दृढ भावनेने घ्यावे; सर्वांना फळ सारखेच मिळेल.

२७. सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे.

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿



No comments:

Post a Comment